भगवद गीता अध्याय 4
ज्ञानकर्मसंन्यासयोग
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 1,2

श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. हे परंतप अर्जुना! अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षीनी जाणला; परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला.
Table of Contents
Toggleजेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली, त्यावेळी अपौरुषेय असे वेद निर्माण झाले. वेदांतामधील मानवी जीवनाचा उत्कर्ष करणारी संस्कृती व ईश्वरभक्ती यांचे शिक्षण देणारे ज्ञानयोग व कर्मयोग भगवंतांनी प्रथम आपला शिष्य वैवस्वत म्हणजे सूर्याला सांगितला. सूर्य सर्व ग्रहांचा राजा. जवळजवळ बारा कोटी वर्षांपूर्वी हा योग सूर्याला सांगितला, असे वेदांत शास्त्र सांगते. त्यानंतर मानवाचा जन्म झाला.
वीस लक्ष वर्षांपूर्वी हा योग सूर्याने आपला पुत्र मनूस सांगितला. मनू हा मानवाचा आद्यपुरुष. मनूने आपला पुत्र इक्ष्वाकू याला हा योग सांगितला. हा योगराजाश्रयामुळे लोकांना समजला. नंतर मध्यंतरी हा योग लोक विसरून गेले होते. तो लुप्तप्राय झाला होता.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 3,4

भगवद गीता अध्याय 4 श्लोकआणि अर्थ
तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे. कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे. अर्थात, गुप्त ठेवण्याजोगा आहे. अर्जुन म्हणाला, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता, असे कसे समजू?
पुढे द्वापारयुगाच्या शेवटी शेवटी म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वी हाच लुप्त झालेला गुह्य योग महाभारत काळात श्री भगवंतांनी कौरव-पांडव यांच्या धर्मयुद्धाच्या प्रसंगी कुरुक्षेत्रावर आपला सखा व भक्त अर्जुनाला गीतेच्या स्वरूपात सांगितला. हा योग अतिशय गुह्य असा आहे. तो योग्य माणसाला सांगितला पाहिजे.
अर्जुन हा अतिशय योग्य भक्त असल्याने भगवंतांनी तो अर्जुनास सांगितला. म्हणूनच गीता आपणा सर्व साधकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. अर्जुन फार हुशार. त्याने भगवंतांना विचारले की, आपला जन्म अलीकडचा आहे. मग हा योग तुम्ही सूर्याला सांगितला असे कसे म्हणता? अर्जुनाच्या या प्रश्नाने भगवंत अतिशय प्रसन्न झाले.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 5,6

भगवद गीता अध्याय 4 श्लोकआणि अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे परंतप अर्जुना! माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहेत. मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो.
अर्जुनाने अतिशय चांगला प्रश्न विचारला म्हणून भगवंत खूश झाले. ते म्हणाले की, हे अर्जुना! सर्व प्राणिमात्रांचे त्यांच्या कर्मानुसार अनेक जन्म होतात; परंतु गतजन्मांचे त्यांना स्मरण राहत नाही. पण, मी जन्मरहित आहे, अविनाशी आहे. सर्व चराचराचा ईश्वर आहे. मलासुद्धा जगाच्या कल्याणासाठी अनेक जन्म घ्यावे लागले आहेत; पण ते सर्व जन्म मला माहीत आहेत.
पूर्वजन्मातील घटनांचे स्मरण जीवात्म्याला होत नाही. जीवात्म्याचे देहांतर होते. भगवंताचे नाही. जीवात्मा देह जाणतो. भगवंत जग जाणतो, कारण तो कालातीत आहे. हाच महत्त्वाचा फरक जीवात्मा आणि भगवंत यात आहे. सूर्य हा स्थिर आहे; पण इंद्रियांच्या अल्प कुवतीमुळे त्यास उदय व अस्त आहेत, असे आपण म्हणतो.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 7,8

भगवद गीता अध्याय 4 श्लोकआणि अर्थ
हे भारता! जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तमप्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.
जेव्हा जेव्हा सत्त्वगुणांचा हास होतो व रजोगुण आणि तमोगुण वाढीस लागतात. तेव्हा तेव्हा लोक धर्माचरण करीत नाहीत. धर्माला ग्लानी येते. पापी लोक प्रबळ होऊ लागतात व सज्जन लोकांचा छळ होतो. अशा वेळी धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी व पापी लोकांचे निर्दालन करून सज्जनांचा उद्धार करण्यासाठी युगायुगात भगवंताला अवतार घ्यावा लागतो.
अधर्माचे उच्चाटन व दुर्जनांचा संहार करणे, भक्तांचे व संतांचे रक्षण करणे हेच भगवंताच्या अवताराचे प्रमुख उद्दिष्ट असते. भगवंत अजन्मा असले तरी त्यांनावेळोवेळी जन्म घ्यावे लागतात. त्यामुळे भगवंताला सर्व काळातील सर्व घटना आठवतात. हे इतर सजीवांना शक्य होत नाही. विस्मरण हे सर्व सजीवांना त्यांच्या कल्याणासाठी दिलेले वरदान आहे. भगवंताचे स्मरण केल्यामुळे जीवात्म्याचे कल्याणच होते.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 9,10

भगवद गीता अध्याय 4 श्लोकआणि अर्थ
हे अर्जुना! माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे, असे जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत.
भगवंत म्हणतात की, माझे अवतारकार्य अतिशय भव्य, दिव्य, निर्मळ आणि अलौकिक असे असते. माझे अवतारकार्य संपले की मी भगवद्धामाला परत येतो. भक्तांच्या संगतीत मी माझा काळ घालवतो. मानवी शरीर हे विनाशी, अज्ञानी व पूर्ण दुःखी आहे. त्याने जर आपली आसक्ती, भय व क्रोध बाजूला सारून माझी भक्ती केली, मला जाणले तर त्याला मुक्ती प्राप्त होते. तो मलाच येऊन मिळतो. तो जन्म-मरणाच्या फेऱ्यातून वाचू शकतो.
आतापर्यंत असे अनेक भक्त मला येऊन मिळाले आहेत; पण ज्या अज्ञानी जीवांचा माझ्या ठिकाणी भाव नाही, प्रेम नाही, तो जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकून अखंड दुःख भोगीत राहतो. दुःखातून त्याची सुटका नाही.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 11,12

हे पार्था! जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसेच भजतो. कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. या मनुष्यलोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात. कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते.
जगात व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे. इच्छा वेगळ्या. आवडी निवडी वेगळ्या. कोणी ज्ञानी, तर कोणी अज्ञानी. कोणी बुद्धिमान, तर कोणी अल्पमती. सर्वांना भगवंत हवा असतो. कुणाला भोग किंवा विषय हवे असतात. कुणाला मोक्ष हवा असतो. भगवंत आपल्या पोटी जन्मावा असे कुणाला वाटते, तर भगवंताशी लग्न लावावे असे कुणाला वाटते. कुणाला तो सखा असावा असे वाटते, तर कुणाला गरू असावा असे वाटते.
भगवंत सर्वांची इच्छा पूर्ण करतो. वास्तविक भगवंत एकच आहे; पण अल्पमती मनुष्याने अनेक देवतांची पूजा वा भक्ती सुरू केली. त्या देवता माणसाला अनित्य वस्तू देतात, सिद्धी देतात आणि आध्यात्मिक प्रगती थांबते. नित्य व शाश्वत ब्रह्मास तो मुकतो. सकाम कर्म करणाऱ्याची अधोगती होते. निष्काम कर्मयोगी तरतात.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 13,14

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह, गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टिरचना इत्यादी कर्माचा मी कर्ता असूनही मला-अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज. कर्मांच्या फळांची मला स्पृहा नाही, त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत. अशा प्रकारे जो मला जाणतो, त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही.
भगवंत हा सृष्टीचा उत्पत्तिकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता आहे. गुण व कर्मानुसार चारही वर्णांचा उत्पत्तीकर्ताही भगवंतच आहे. सत्त्वगुणी व बुद्धिवान लोकांना ब्राह्मण ही संज्ञा दिली. राज्यकारभार करणारे सत्त्व वा तमोगुणी लोकांना क्षत्रिय ही संज्ञा दिली. व्यापार व शेती करणाऱ्या रजोगुणी व तमोगुणी लोकांना वैश्य ही संज्ञा दिली.
सेवा करणारा तमोगुणी सेवकवर्ग, आहे त्यांना शूद्र ही संज्ञा दिली. पशू अवस्थेतून मानव अवस्थेत उत्क्रांत होण्यासाठी हे वर्ण निर्माण केले आहेत. असे असले तरी- भगवंत अकर्ताच आहे. तो अविनाशी आहे. त्याला कर्म फळाची अपेक्षा नाही. त्यामुळे जो मला भजतो त्याला कर्माचे बंधन राहत नाही. तो मुक्त होतो.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 15,16

भगवद गीता अध्याय 4 श्लोकआणि अर्थ
पूर्वीच्या मुमुक्षंनीसुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्मे केली आहेत. म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर. कर्म काय व अकर्म काय, याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात. ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. मग तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. अज्ञानी लोक सकाम कर्म करतात, तर ज्ञानी लोक निष्काम कर्म करतात. त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ मिळते.
यापूर्वीसुद्धा मी ब्रह्मज्ञान सूर्याला दिले. त्याने मनूला दिले. मनूने इक्वाकुला दिले. नंतर ते नारद, सनकादी मुनी, यम, नचिकेत, प्रल्हाद, जनक, भृगू, कपिल, शुकमुनी इ. मुमुक्षु भक्तांनी आत्मसात केले. ते आज मी तुला माझा लाडका भक्त म्हणून देत आहे. कर्मतत्त्व मी तुला समजावून सांगेन. कर्म, अकर्म व विकर्म म्हणजे काय हे मी तुला सांगेन म्हणजे तू कर्मबंधनातून आपोआप मुक्त होशील. कर्मबंधन हे नेहमीच अशुभ असते, असे भगवंतांनी अर्जुनास सांगितले. भगवंतावर निष्ठा ठेवून निष्काम कर्म जर आपण केले, तर आपल्या जीवनाचे नक्कीच सार्थक होईल.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 17,18

भगवद गीता अध्याय 4 श्लोकआणि अर्थ
कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, कारण कर्मांचे तात्त्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहील आणि अकर्मामध्ये कर्म पाहील, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे.
कर्माचे तीन विभाग सांगितले आहेत. कर्म, अकर्म व विकर्म हे तीन विभाग आहेत. निष्काम भावनेने सर्व कर्म ईश्वरार्पण करणे हेच खरे कर्म होय. जे कर्म शास्त्रसंमत नसते, जे कर्म निषिद्ध समजले जाते त्याला विकर्म म्हणतात. कर्म करावे न लागणे किंवा कर्म न करणे याला अकर्म असे म्हणतात. कर्माचे तात्त्विक स्वरूप समजणे अतिशय अवघड असते. कर्मामध्ये अकर्म पाहता आले पाहिजे किंवा अकर्माम्ध्ये कर्म पाहता आले पाहिजे, तोच खरा बुद्धिमान मनुष्य समजला जातो. जो परमात्म तत्त्वात तृप्त असतो तो कर्म करीत असूनही काहीच करीत नाही, कारण तो कामनारहित व संकल्परहित असतो.
त्याला काही करायचे राहिलेलेच नसते. तो आत्मतृप्त असतो. यालाच कर्मामध्ये अकर्म पाहणे, असे म्हणतात. जो जितेंद्रिय आहे. त्याला शरीरधर्मासाठी कराव्या लागणाऱ्या कर्माचे बंधन राहत नाही. तो कर्मबंधनातून मुक्तच असतो.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 19,20

ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्यतृप्त असतो, तो कर्मांमध्ये उत्तमप्रकारे वावरत असूनही काहीच करत नाही.
साधकाचे अज्ञानी, मुमुक्षु व ज्ञानी असे तीन वर्ग पडतात. अज्ञानी म्हणजे ज्याचा भगवंतावर विश्वास आहे, पण साधना कशी करावी हेच समजत नाही, त्याचे चित्त शुद्ध नसते. त्याने सद्गुरूंची भेट घेऊन साधनाला सुरुवात करावी, जे मुमुक्षु आहेत त्यांची साधन मार्गावर वाटचाल सुरू असते. पण चित्तशुद्धी पूर्णपणे झालेली नसते व साधनेचा जोर कमी असतो;
पण जे ज्ञानी असतात त्यांची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात. यालाच निष्काम कर्म म्हणतात. तेच अकर्म होय, कारण त्याने सर्व कर्म ईश्वरार्पण केलेले असते. त्याला फळाची काहीच अपेक्षा नसते.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 21,22

ज्याने अंतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरसंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थांत नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही.
आत्मज्ञानी मनुष्याची लक्षणे सांगताना भगवंत म्हणतात, जो खरा ज्ञानी किंवा पंडित असतो तो जितेंद्रिय असतो. मन, बुद्धी व अंतःकरण त्याच्या ताब्यात असतात. आशा-निराशा, सुख-दुःख, यश-अपयश, लाभ-हानी अशा द्वंद्वापासून तो दूर असतो. तो आनंदानुभावात तृप्त असतो.
ईश्वरचरणी लीन होण्यासाठी, शरीरधर्म सांभाळण्यासाठी व शरीराचे रक्षण करण्यासाठी तो कर्मे करीत असतो. अशा कोणत्याही कर्मामध्ये पाप आडवे येत नाही. तो कर्म करीत असूनही काहीच करीत नसतो, कारण त्याची सर्व जबाबदारी भगवंतांनी उचललेली असते. तो मिळेल त्यात संतुष्ट असतो.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 23,24

भगवद गीता अध्याय 4 श्लोकआणि अर्थ
ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. ज्या यज्ञात अर्पण अर्थात सुवा आदी ही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे, त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे.
मनुष्य जन्माला आला की, त्याला कर्म हे करावेच लागते; पण जो ईश्वरकर्ता असे समजून ईश्वरासाठीच कर्म करतो, त्या कर्माला ब्रह्मकर्म असे म्हणतात. यज्ञाची उपमा देऊन भगवंतांनी अशा कर्माचा गौरव केला आहे. हविद्रव्याप्रमाणे ब्रह्म यज्ञात सर्व कर्म जळून जाते. अशा यज्ञाचा कर्ता ब्रह्म आहे, यज्ञाचे कर्म ब्रह्म आहे व यज्ञाचे यजमानही ब्रह्मच आहे. अशा ब्रह्म यज्ञाचे फळदेखील ब्रह्मच असते. अशा व्यक्तीला इंद्रिये असली काय अन् नसली काय, सारखेच वाटते. त्याचे ममत्व, अभिमान जळून जातात.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 25,26

दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तमप्रकारे अनुष्ठान करतात, तर इतर योगी परब्रह्म परमात्मारूपी अग्नीत अभेददर्शनरूप यज्ञाच्या द्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन करतात, तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात.
भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी लोक अनेक प्रकारचे यज्ञ करतात. श्री विष्णूला यज्ञ अशी एक संज्ञा आहे. प्रामुख्याने यज्ञाचे दोन प्रकार पडतात. द्रव्ययज्ञ व ज्ञानयज्ञ. अनेक देवदेवतांना प्रसन्न करून ऐश्वर्य, द्रव्य, आयुष्य, सुख, समृद्धी, सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी विविध द्रव्यांचे हवन करून द्रव्ययज्ञ केला जातो; पण हे क्षणैक सुख आहे, याची त्यांना कल्पना नसते. नंतर ते दुःखी होतात; पण जे ज्ञानी आहेत ते ज्ञानयज्ञ करून ब्रह्मप्राप्ती करून घेतात. मनुष्यास योगी बनता यावे म्हणून चार आश्रमांची व्यवस्था आहे.
मनुष्यदेह हा पशूप्रमाणे केवळ इंद्रियभोग भोगण्यासाठी नाही. ईश्वर चिंतन करून मोक्षप्राप्तीसाठी आहे. ब्रहमचर्याश्रमात श्रवणभक्ती व गुरुआज्ञा. गृहस्थाश्रमात यज्ञ व देवपूजा. वानप्रस्थाश्रमात मोह व संसारत्याग तर संन्यासाश्रमात संन्यास घेऊन योगी बनावे.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 27,28

अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयमयोगरूपी अग्नी त्यात हवन करतात. काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात. तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे किती तरी यत्नशील मनुष्य स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात.
अनेक लोक अनेक प्रकारचे यज्ञ करीत असतात. कोणी द्रव्ययज्ञ करतात. दवाखाने, धर्मशाळा, पाणपोई, अन्नछत्र यासाठी द्रव्य देतात. कोणी जप, तपश्चर्या, अनुष्ठान करून तपयज्ञ करतात. कोणी हटयोग, अष्टांगयोग, पतंजलीयोग, प्राणायाम करून योगयज्ञ करतात. कोणी उपवास, व्रतवैकल्ये, नक्त करून स्वाध्याययज्ञ करतात, तर कोणी ज्ञानमार्गाचा अवलंब करून ब्रह्मयज्ञ करतात.
सर्व यज्ञ माझ्यापर्यंत पोहोचतात. मी सर्वांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो. जे ज्ञानी असतात, त्यांना ब्रह्म देऊन ब्रह्मानंदात ठेवतो. त्या अखंड आनंदाचा लाभ त्यांना मिळतो. सर्व यज्ञांमध्ये ब्रह्मयज्ञ अत्यंत महत्वाचा यज्ञ आहे. तो यज्ञ करणारे भक्त मला आवडतात.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 29,30

अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर किती तरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण व अपान यांची गती थांबवून, प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत.
श्वसनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो योगाभ्यास करतात, त्याला प्राणायाम असे म्हणतात. मनुष्याला सुस्थितीत ठेवण्यासाठी पंचप्राण आवश्यक असतात. प्राण, अपान, उदान, व्यान, समान हे ते पाच प्रकारचे वायू आहेत. अपान वायू अधोगामी असतो, तर प्राणवायू उर्ध्वमुखी असतो. या अभ्यासात प्राण व अपान या दोन्ही वायूंचे समत्व साधून श्वास आत घेतला जातो. याला पूरक असे म्हणतात. यात अपानवायूचे प्राणवायूत हवन होते.
जेव्हा श्वास बाहेर सोडला जातो त्याला रेचक असे म्हणतात. यामध्ये प्राणवायूचे अपानवायूत हवन होते. जेव्हा प्राण व अपान या दोन वायूंचा पूर्ण अवरोध होतो, तेव्हा त्याला कुंभक असे म्हणतात. कुंभकामुळे आयुष्य वाढते.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 31,32

हे कुरुश्रेष्ठ अर्जुना! यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्यलोकसुद्धा सुखदायक होत नाही, तर परलोक कसा सुखदायक होईल? अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत, असे समज. अशाप्रकारे तत्त्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील.
मनुष्याला आपल्या यथार्थ जीवनाची कल्पनाच नसते. इंद्रियसुख हेच त्याला सर्वस्व वाटते याचे कारण अज्ञान होय, धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ साध्य करीत त्याला मोक्ष हा महत्त्वाचा पुरुषार्थ साध्य करायचा असतो.
या ब्रह्मयज्ञातून मिळालेल्या अमृतानुभवाचा लाभ घेत भक्त भगवंताला जाऊन मिळतात. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या मन, बुद्धी व शरीर यांच्या योग्यतेनुसार यज्ञ करावा. ते भगवंतालाच प्राप्त होतील; पण जे असा यज्ञ करणार नाहीत, त्यांना मात्र नरकयातना भोगाव्या लागतात.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 33,34

हे परंतप अर्जुना! द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यच्चयावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात. ते ज्ञान तू तत्त्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्म तत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.
द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत महत्त्वाचा आहे हे सांगताना भगवंत म्हणतात की, ज्ञान मिळविण्यासाठी आपण सद्गुरूंकडे गेले पाहिजे. त्यांना नमन करून त्यांची सेवा केली पाहिजे. आपल्या मनात येणारे प्रश्न त्यांना सरळ मनाने व मनात कोणतेही कपट न ठेवता विचारले पाहिजेत. अशारीतीने त्यांची मर्जी संपादन केली म्हणजे ते सद्गुरू, ते महात्मे आपणास परमात्म तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील. मग तशी साधना केली म्हणजे मग आत्मज्ञान आपोआप समजते.
एवढ्यासाठीच गुरुकुल पद्धती होती. गुरुगृही राहून विद्यार्जन करण्याची मुभा होती. गुरुजन किंवा आत्मज्ञानी ऋषिमुनी आपल्या शिष्यांना ज्ञानदान करीत असत. असे ज्ञान प्रत्येकाने मिळवावे, असे अर्जुनाला उद्देशून भगवंत सांगत आहेत.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 35,36

भगवद गीता अध्याय 4 श्लोकआणि अर्थ
जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस, तसेच हे अर्जुना! ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंदघन परमात्म्यात पाहशील. जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास, तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्याप्रकारे तरून जाशील.
सद्गुरूंनी आपल्याला ज्ञानामृत पाजले की, आपल्याला माहीत होते की, आपण सर्व जीव परमेश्वराचेच अंश आहोत. ईश्वरसेवा हीच खरी सेवा आहे. ईश्वराची अलौकिक सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मानव जन्मामुळे लाभले आहे. इतर पशूपेक्षा आपण वेगळे आहोत, कारण आपल्याला भगवंताने विकसित बुद्धी दिली आहे. ईश्वर आपणास परका वाटतो, कारण ईश्वर व आपण यामध्ये मायेचे (मा=नाही, याही) आवरण आहे. ज्ञानरूपी नौकेत बसून जर मायारूपी पापसमुद्र पार केला, तर आपणास भगवंत नक्की भेटेल. चराचरातील प्रत्येक वस्तूत ईश्वराचा अंश आहे. ते पाहायला शिकले पाहिजे. मग आपण परमात्म्याला पाहू शकू.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 37,38

भगवद गीता अध्याय 4 श्लोकआणि अर्थ
कारण हे अर्जुना! ज्याप्रमाणे पेटलेला अभी इंधनाची राख करतो, तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व काँची राखरांगोळी करतो. या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान किती तरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो.
आत्मा आणि परमात्मा यांच्या संबंधांची तुलना येथे अग्नीशी केली आहे. अग्नी ज्याप्रमाणे इंधनाची राख करतो, सुक्याबरोबर ओलेही जळून जाते, त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नीने शुभ व अशुभ कर्माची राखरांगोळी केली जाते. यासाठी चित्तशुद्धी होणे गरजेचे आहे. निष्काम कर्म करीत गेल्यास सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने असे आत्मज्ञान होते. ज्ञानामुळे मनुष्य पवित्र होतो, कारण आत्मज्ञान हे सदैव पवित्र असते.
हे मोक्षदायक आहे. अशा ज्ञानामुळे मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. त्याला काही कर्म करावेच लागत नाही. तो द्वंद्वातीत होतो. तो कर्मात राहूनही अकर्मी होतो. तो आत्मानंदात तल्लीन होतो. आत्मा आणि परमात्मा हे वेगळे वाटतच नाहीत. हेच खरे भगवद्गीतेचे सार आहे. यालाच ज्ञानकर्म संन्यास असे म्हणतात.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 39,40

भगवद गीता अध्याय 4 श्लोकआणि अर्थ
जितेंद्रिय, साधनतत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत्प्राप्तिरूप परमशांतीला प्राप्त होतो. अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख.
समाजात दोन प्रकारचे लोक असतात. सश्रद्ध आणि अश्रद्ध. श्रद्धा म्हणजे शास्त्राने, सद्गुरूने, वडीलधाऱ्यांनी जे सांगितले आहे ते आहे तसे मान्य करणे होय. अश्रद्ध माणसाचा भगवंतावरच काय, पण स्वतःवरदेखील विश्वास नसतो. मनात संशय निर्माण झाला की, श्रद्धा कमी होते. एवढचासाठी चित्तशुद्धीला फार महत्त्व आहे. चित्त शुद्ध झाले की, मनुष्य भगवंतावर, साधनावर विश्वास ठेवतो.
असा श्रद्धाळू मनुष्य साधनतत्पर होतो. तो इंद्रियांना वश करू शकतो. मग तो आत्मज्ञान मिळवू शकतो. असा ज्ञानी मनुष्य मुक्त होऊन परम शांती प्राप्त करतो. अश्रद्ध मनुष्य अविवेकी व संशयी असतो. तो फक्त विषय आणि क्रोध यातच अडकतो. त्याला सुख, शांती तर मिळत नाहीच, पण इहलोक, परलोक यापैकी काहीच मिळत नाही. त्याला नरकयातना भोगाव्या लागतात.
भगवद गीता अध्याय 4 श्लोक 41,42

हे धनंजया! ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना! तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेकज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा.
भगवंत अर्जुनाला म्हणतात की, हा योग पूर्वी मी सूर्याला सांगितला होता. तो नंतर पृथ्वीवर आला. मध्यंतरी हे ज्ञान लुप्त झाले. आज मी तुला हे गुह्यज्ञान सांगत आहे. ज्याने विवेकाने संशयचा नाश केला आहे, ज्याने इंद्रियांवर ताबा मिळवला आहे, ज्याने सर्व कर्मे भगवंताला अर्पण केली आहेत, अशा मनुष्याची कर्मबंधनातून सुटका होते. म्हणून अर्जुना, तू संशय दूर करून युद्ध कर.
हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्गीतारूपी ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी ज्ञानकर्म संन्यासयोग हा चौथा अध्याय समाप्त झाला.