भगवद गीता अध्याय 2 (सांख्ययोग) bhagwat geeta adhyay 2

भगवत गीता अध्याय 2 

Table of Contents

भगवत गीता अध्याय 2

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 2-6

bhagwat geeta adhyay 2 shlok 2-6

        म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे! युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील, हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव-धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत.

अत्यंत विषण्ण व शोकाकुल असलेला अर्जुन क्षात्रधर्म सोडून आता भिक्षा मागून जगण्याची भाषा बोलू लागला.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 7,8

भगवत गीता अध्याय 2

            करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा; कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्यसमृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल, असा उपाय मला दिसत नाही. अर्जुन हा श्रीकृष्णाचा आत्येभाऊ होता, भक्त व सखा होता.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 9,10,11,12

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 9,10,11,12

               संजय म्हणाला, हे राजा! निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले, हे अर्जुना ! तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस; परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान शोक करीत नाहीत. मी कोणत्याही काळी नव्हतो तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते, असेही नाही. आणि यापुढे आम्ही असणार नाही असेही नाही.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 13,14,15

bhagwat geeta adhyay 2 shlok 13 ,14,15

          ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य, आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. हे कुंतीपुत्रा! इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता! ते तू सहन कर, कारण हे श्रेष्ठ पुरुषा! सुख-दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो.

          केवळ अज्ञानापायी आपला भक्त क्षात्रधर्म विसरून शोक करीत आहे हे श्रीकृष्णाने जाणले व त्याला आत्मज्ञानाची गरज आहे हे जाणले. या अध्यायात भगवंतांनी सांख्ययोगाचे मार्गदर्शन केले आहे. पितामह व गुरू हे कर्म व धर्म कसेविसरले आहेत हे सांगितले. इंद्रियांवर जय मिळवला तर मोक्ष मिळतो हे सांगितले.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 16,17,18

bhagwat geeta adhyay 2 shlok 16,17,18

            असत् वस्तूला अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. ज्याने हे सर्व जग-दिसणाऱ्या सर्व वस्तू-व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. या नाशरहित, मोजता न येणाऱ्या, नित्यस्वरूप जीवात्म्यांची ही शरीरे नाशिवंत आहेत, असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना! तू युद्ध कर.

            मानवी जीवन ही एक मौल्यवान गोष्ट आहे. मानवी जीवनाचा जर सत्कार्यासाठी, भगवत्प्राप्तीसाठी उपयोग झाला, तर ते जीवन सार्थकी लागले असे समजावे. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, समस्या या असणारच. त्या सोडवून पुढे जाणे हे ज्ञानी माणसाचे काम आहे. प्रापंचिक आसक्ती बाह्य विकारावर अवलंबून असते. ती कमी होण्यासाठी सद्‌गुरूंना शरण गेले पाहिजे.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक19 ,20,21

भगवद गीता अध्याय 2 श्लोक19 ,20,21

          जो या आत्म्याला मारणारा समजतो, तसेच जो हा मेला असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत, कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही, कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. हे पार्था! जो पुरुष हा आत्मानित्य, नाशरहित, न जन्मणारा आणि न बदलणारा आहे हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील? जन्म, वृद्धत्व, व्याधी व मृत्यू या मुख्य समस्या आहेत.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 22,23,24

गीता अध्याय 2 श्लोक22-23-24

         ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. या आत्म्याला शस्त्रे कापू शक्त नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि बारा वाळवू शकत नाही; कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे.

        आत्मा हा अमर आहे. तो शरीर बदलतो किंवा परमात्म्यात विलीन होतो. जीवात्मा हा परमात्म्याचा अंश आहे. तो सर्वव्यापी आहे. त्याच्या अस्तित्वाचे ज्ञान अनुभवाने होते. प्रयोगशाळेत नव्हे.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 26,27

bhagavad-gita-chapter-2-shloka-26-27

        हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना! हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे, हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही; परंतु जर तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे, असे मानत असशील, तरीसुद्धा तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. कारण, असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही.

          ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे व ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म आहे. मग शोक करण्याचे काहीच कारण नाही. पूर्व कर्मानुसार जन्म प्राप्त होतो. समाजाच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी युद्ध व हिंसा अटळ असते. कुरुक्षेत्रावरील युद्ध हे ईश्वरी इच्छा होती. म्हणून ते अटळ होते. ते क्षात्रधर्माला अनुसरून होते. अर्जुनाने युद्धाला सामोरे जाणे हेच योग्य होते. ते मुळीच पापकर्म नव्हते.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 28,29,30

bhagavad-gita-chapter-2-shloka-28-,29-,30

          हे अर्जुना! सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात. फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा? एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्त्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत. हे अर्जुना! हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो. म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही.

           आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी व्यक्त होते. पूर्वी सारे अव्यक्त होते. ते व्यक्त झाले इतकेच. संपत्तीने समस्या सुटत नाहीत, तर त्या वाढतात.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 31,32,33

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-31,-32,-33

           तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये; कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. हे पार्था! आपोआप समोर आलेले, उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते; परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. जो पीडा होण्यापासून रक्षण करतो तो क्षत्रिय होय. हे धर्मयुद्ध आहे. ते केले तर

         स्वधर्म वं कीर्ती दोन्हीही प्राप्त होतील. अर्जुनाने युद्धच केले नाही तर मात्र तो नरकाचा मार्ग मोकळा करेल. त्याची कीर्ती व नावलौकिक धुळीला मिळेल, असे श्रीकृष्ण सांगतात. युद्धातून पळून जाऊन दुष्कीर्तिप्राप्त होण्यापेक्षा मरण केव्हाही बरे. अर्जुन हा शूर आहे. त्याला शंकराकडून पाशुपतास्त्र प्राप्त झाले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला निर्वाणीचा उपदेश म्हणून हे सांगितले आहे.

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-34,-35,-36

         तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील. आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुःसह वाटते. शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास, त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ उरशील. ते महारथी लोक तू भिऊन युद्धातून काढता पाय घेतला, असे मानतील. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे?

          अर्जुन हा भगवंताचा लाडका भक्त आहे, सखा आहे. म्हणून अर्जुन मरणाला घाबरला, युद्धाला भ्याला असे शत्रूला वाटू नये, असे भगवंताला वाटते. युद्धात झालेली हत्या व संहार क्षम्य असतो. म्हणून अर्जुनाने धर्मयुद्ध करावे व क्षात्रधर्म पाळावा, असे ते म्हणतात. अर्जुनाला अज्ञानामुळे विषाद निर्माण झाला आहे.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 37,38,39

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-37-,38-,39

            युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील, म्हणून हे अर्जुना! तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. जय- पराजय, फायदा-तोटा आणि सुख-दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. हे पार्था! हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला. आणि आता कर्मयोगाविषयी ऐक, ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील.

            भगवंतइच्छेने केलेल्या कर्मात सुख-दुःख, लाभ-हानी, आणि जय-पराजय यांचा विचार करायचा नसतो. भगवंतांनी अर्जुनास मी सांगतो म्हणून युद्धासाठी युद्ध कर, अशी आज्ञाच केली. निष्काम कर्मयोगामुळे कर्माचे बंधनच नाहीसे होते. सांख्ययोग म्हणजे शरीर व जीवात्मा यांचे पृथ्थकरणात्मक तत्त्वज्ञान होय. ते भगवंत सांगताहेत.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 40,41

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-40,-41

             या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही, आणि उलट फळरूपी दोषही नाही. इतकेच नव्हे, तर या कर्मयोगरूप धर्माचे थोडेसेही साधन जन्म-मृत्युरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. हे अर्जुना! या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते; परंतु अस्थिर विचार असणाऱ्या, अविचारी, कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात.

        भगवंतइच्छेने केलेल्या कर्माची सुरुवात जरी अल्प असली तरी त्याचा क्षय होत नाही. करते. उलट ते हळूहळू वाढतच जाते. जीवन आसक्तिरहित निश्चयात्मक बुद्धी म्हणजे भयापासून ते आपली मुक्तता सांख्ययोगच होय. अर्जुनाचे अज्ञान नाहीसे होऊन त्याचा विषाद कमी व्हावा म्हणून भगवंतांनी सांख्ययोग सांगितला. अर्जुनाने क्षात्रधर्माचे पालन करून युद्ध करावे हाच भगवंतांचा मुख्य उद्देश होता. शरणागत होऊन भगवंतइच्छेने केलेले निष्काम कर्म म्हणजेच सांख्ययोग होय. फलाशा सोडून केलेले कर्म श्रेष्ठ होय. विषयासक्त लोक भौतिक सुखाकडे ओढले जातात. त्यांचा स्वर्ग, नरक, मोक्ष, पाप, पुण्य यावर मुळी विश्वासच नसतो. असे अज्ञानी लोक सकाम कर्मे करतात व अधोगतीला जातात.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 42,43,44

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-42,-43,-44

            हे पार्था! जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी नसते.

         समाधी म्हणजे स्थिरबुद्धी किंवा स्थिर अंतःकरण. जेव्हा चित्त आत्मज्ञानात स्थिर होते, तेव्हा त्याला समाधी असे म्हणतात. जे भोगात रमतात, त्यांना निश्चयी बुद्धी प्राप्त होत नाही. निश्चयी बुद्धी असल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. ज्ञानाने विषाद
नष्ट होतो.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 45,46,47,48

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 45,46,47,48

         हे अर्जुना! वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख-दुःखादी द्वंद्वांनी रहित नित्य वस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित, योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते.

        तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस. तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले जाते.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 49,50,51

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-49,-50,-51

         या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजया! तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे; कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात. समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात, त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा. हा समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे; कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मबंधनापासून मुक्त होऊन परमपदाला प्राप्त होतात.

          मनुष्य जन्माला आला की, त्याला कर्म करावेच लागते. ते चुकविता येत नाही. कर्म तीन प्रकारचे असते. नित्य, नैमित्तिक व सकाम कर्म. नित्यकर्मे शरीरधर्माला अनुसरून असतात. ती निष्काम असतात. इतर कर्मे फलाशा सोडून निष्काम भावनेने करावीत.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 52,53,54

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-49,-50,-51

            जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह-पर लोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. त-हेत-हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. अर्जुनाने विचारले, हे केशवा ! जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो?

      अर्जुन खूप हुशार, चाणाक्ष व धूर्त भक्त आहे. भगवंताला मध्येच प्रश्न विचारून शंका निरसन करून घेत आहे. स्थिरबुद्धी पुरुषाची लक्षणे कोणती हे आता अर्जुन भगवंताला विचारीत आहे.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 55,56,57

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-55,-56,-57

      भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना! ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व  कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो,, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर असते.

        भगवंत आपल्या लाडक्या अर्जुनाला म्हणतात की, ज्याला सुख, दुःख, भय, क्रोध, प्रीती याबाबतीत काहीच भावना नसते, मनात काहीच इच्छा नसते, जो आत्मानंदात असतो तो स्थितप्रज्ञ.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 58,59,60

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-58,-59,-60

          कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात, परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते.

         हे अर्जुना! आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. जो कासवाप्रमाणे इंद्रिये आत ओढून घेतो, जो आसक्तिरहित असतो, ज्याचे मन ताब्यात आहे तो खरा स्थितप्रज्ञ होय. इंद्रिये भगवंत सेवेत गुंतवून ठेवली तरच ती भोगापासून दूर राहतात.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 61,62,63

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-61,-62,-63

          म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करून, मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे; कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की, क्रोध म्हणजे राग येतो. रागामुळे अत्यंत मूढता येते, अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की, बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होती.

      विषयवासनेमुळे आसक्ती, आसक्तीमुळे कामना, कामनापूर्ती न झाल्यास क्रोध, क्रोधामुळे अविचार, अविचाराने स्मरणशक्तीचा ऱ्हास, स्मरणशक्तीच्या हासामुळे बुद्धिनाश होतो. बुद्धिनाशामुळे माणसाचे अधःपतन होते. म्हणून स्थिरबुद्धी हवी. मन, इंद्रिये ताब्यात ठेवून ध्यानास बसावे, असे भगवंत म्हणतात .

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 64,65,66

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-64,-65,-66

      भगवद गीता अध्याय 2 शोक आणि अर्थ

         परंतु, अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेषरहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही, मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोट्न मिळणार?

     सुख हे मनाच्या शांतीवर अवलंबून असते. जो भावशून्य आहे, त्याला शांती मिळत नाही. ज्याची बुद्धी स्थिर नाही तो नास्तिक असतो. जो नास्तिक असतो त्याचे मन व इंद्रिये ताब्यात नसतात.असा मनुष्य निष्काम कर्म करू शकत नाही . त्याचे अध:पतन होते.

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 67,68,69

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-67,-68,-69

        कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते, ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते. म्हणून हे महाबाहो! ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर असते. सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते.

    शत्रूला शक्तीच्या जोरावर नियंत्रित ठेवता येते; पण इंद्रियांना ईश्वरभक्तीला लावल्याशिवाय नियंत्रणात ठेवता येत नाही. म्हणून सद्‌गुरूंना शरण जावे. ते आपणास योग्य मार्ग दाखवितात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला आध्यात्मिक विकास करता येतो, व मोक्षही प्राप्त करून घेता येतो, हेच भगवंतांना येथे सांगायचे आहे.,

भगवद गीता अध्याय 2 श्लोक 70,71,72

भगवद-गीता-अध्याय-2-श्लोक-70,-71,-72

        भगवद गीता अध्याय 2 शोक आणि अर्थ 

  ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा नव्हे. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो, त्यालाच शांती मिळते. हे पार्था! ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही. आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवितो.

     हे परमसत्य आहे. श्रीमदगीगवद्भतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी सांख्ययोग हा भगवद गीता अध्याय 2 समाप्त झाला.

भगवद गीता अध्याय 2 यूट्यूब

Leave a Comment